निसर्गात जगण्यासाठी हवा, पाणी व अन्न (स्वतः शेतीत थोडेसे कष्ट केले तर अन्नही) सर्व फुकटच आहे व आनंद देणाऱ्या सर्व गोष्टी उदा: नदी, समुद्रात, विहिरीत, तलावात पोहणे, उड्या मारणे, जंगलात, डोंगरावर फिरणे, नदीकाठी, समुद्राच्या वाळूत बसणे, जंगलात, शेतात रानफळ खात फिरणं, मासे, खेकडे पकडून खाणे; सर्वोच्च आनंद देणारा कामक्रीडा (सेक्स) सर्व काही फुकटात असताना माणूस पंधरा ते वीस वर्षे शिक्षण व तीस ते चाळीस वर्षे नोकरी किंवा व्यवसाय करतो. ह्या काळात मुलांचे बालपण, तरुणपण सर्व हिरावले जाते. वेळेवर जेवण नाही की झोप. झोप मिळाली तरी अपुरी, प्रदूषण, खोट्या जबाबदाऱ्या, माझं कस होईल, माझ्या मुलाचं कस होईल, नीट शिक्षण होईल की नाही, शिक्षण झाले तर चांगली नोकरी मिळेल की नाही, मिळाली तर टिकेल की नाही, टिकली तर मुलाला लग्नासाठी मुलगी मिळेल की नाही, घर घेता येईल की नाही, घेतले तर कर्ज नीट फेडता येईल की नाही. ह्यासाठी अवेळी काम, जास्त काम व इतर सर्व त्रासामुळे, सर्व चुकीच्या जगण्यामुळे माणसाला उच्च रक्तदाब, क्षय, मधुमेह, कॅन्सर, किडनी निकामी होणे व अन्य गंभीर आजार लवकर झाल्यामुळे त्याच्या जीवनातील आनंदच नाहीसा होतो व जीवन नरकमय होते. पण त्याने केलेल्या ह्या कृत्याबद्दल लोकांसमोर बोलत नाही व त्यामुळे पुढील पिढीही अशीच जगते.
ह्या अश्या चुकीच्या जीवनपद्धतीचे खरे कारण आहे आपलं चुकीचे शिक्षण. लहानपणापासून शाळेत, कॉलेजमध्ये, कारखान्यात, ऑफिसमध्ये, सभा, समारंभात एकाच पध्दतीचे बोलणे असते व चुकीचा संस्कार घडतो. काही लोक जाणूनबुजून तर काही सज्जन असतात पण भोळेपणाने अशी, गुलाम, लाचार पिढी घडवली जाते. त्यात स्वाभिमान, स्वावलंबन, स्वयंपूर्ण, स्वातंत्र अशा अतिमहत्त्वाच्या गोष्टींना महत्त्व दिले जात नाही. त्यात प्रामुख्याने खूप कमी माणसे मोठ्या पदावर गेलेली असतात, प्रसिद्ध झालेली असतात, अशांची उदाहरणे देऊन नादी लावले जाते. खूप मेहनत करायची, निष्टेने काम करायचे, रात्रीचा दिवस करायचा, कमी झोपायचे, कामात झोकून द्यायचे, प्रामाणिकपणे, इमानदारीने काम करायचे, अपमान सहन करायचा, त्रास सहन करायचा, उगाच प्रवाहा विरोधात जायचे नाही, सर्वच अस करतात-जगतात मग आपण काय वेगळे आहोत. जिद्द, महत्वाकांक्षा, यश-अपयश, जय-पराजय, स्वप्न, गोल, टार्गेट, लाइफस्टाइल, स्टेटस, स्टाईल, बँक डेटेड, मागास-विकास, सुशिक्षित-अशिक्षित, गावठी, गावंढळ- शहरी अशा फसव्या शब्दांत लोकांची वाट लावली जाते. आयुष्यात तो बिचारा नीट जगतच नाही.
श्रीमंत लोकांसाठी अशीच गुलाम, लाचार मानसिकतेची माणस हवी असतात. म्हणून हे असं वातावरण बनवलं जात व जो प्रदूषण करून, जमीन, जंगल, शेती, विहरी, नद्या, ओहळ, तलाव, समुद्र, वातावरण सर्व काही प्रदूषित करतो, सरकारचा टॅक्स चोरी करतो, संपाचे कारण दाखवून कारखाना बंद करतो, लोकांना देशोधडीला लावतो, देश सोडुन पळतात (काही अपवाद वगळता). अशा लबाड, धूर्त निसर्गद्रोही, मनुष्यद्रोही मालकासाठी, शेठसाठी, साहेबासाठी आपण आपलं आयुष्य पणाला लावतो, आयुष्याची वाट लावून घेतो. कशासाठी? लाइफस्टाइल - म्हणजे खोट्या आधुनिक जीवनशैली साठी.
जीवनात साधेपणा आणा, साधेपणात खर सूख आहे व गरजा कमीतकमी करा. अन्न वस्त्र व निवारा ह्या मूलभूत गरजांसाठी स्वतः स्वावलंबी व्हा, स्वयंपूर्ण व्हा व आपलं गावही करा. सुखी-समाधानी व शांतपणे जगण्याचा साधा सोपा व सरळ उपाय, स्वयंपूर्ण व्हा, स्वावलंबी व्हा. विषय मोठा आहे पण समजणाऱ्या माणसास हे पुरेस आहे. लक्षात घ्या स्वावलंबन व स्वयंपूर्ण हा विषय न समजणारे जास्त आहेत व थोडयाफार लोकांना समजते ते काही अतिमहत्त्वाची सोपी गोष्ट जनतेला का समजवत नाहीत ह्याचा विचार करा. तुम्हाला उत्तर आपोआपच मिळेल. स्वयंपूर्ण व्हा.
- कुंदन राऊत (नरपड, डहाणु)
Publish on your social media channel through the share buttons available on this page only.